जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना ‘सत्यशोधक शिक्षक पुरस्कार’ जाहीर
डॉ. बाबा आढाव यांच्या सन्मानाचा हा सोहळा सत्यशोधक व समाजपरिवर्तनवादी चळवळीला नवा आयाम देणारा ठरणार आहे.
आटपाडी kd24newz ;पुणे – शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा समिती, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना ‘सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या श्रीमंत श्री. खासेसाहेब पवार सभागृहात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यातील प्रमुख मान्यवरांमध्ये जेष्ठ सत्यशोधक उत्तमराव (नाना) पाटील, तरवडी यांचे शुभहस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असून, उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे, अध्यक्ष म्हणून शेतकरी उद्योजक राजकुमार धुरगुडे आणि स्वागताध्यक्ष म्हणून श्री. शिवाजी मराठा सोसायटीचे सचिव अण्णासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्यांमध्ये समाजकार्यकर्त्या अबेदा इनामदार, माजी महापौर वैशाली बनकर व कमल व्यवहारे यांचा समावेश आहे.
विशेष अतिथी म्हणून कुलपती शिवाजीराव कदम, पुणे जिल्हा मंडळ सचिव संदीप कदम, अ.भा. मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव सौ. प्रमिलाताई गायकवाड, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप, मराठवाडा मित्र मंडळाचे डॉ. भाऊसाहेब जाधव, काकडे शिक्षण संस्थेचे प्रा. शरदचंद्र काकडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज विलास साठे, उद्योजक किरण इंगोले व आर्किटेक्ट मारुतीराव जाधव या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमातील वैचारिक संवाद सत्रात बारामती प्रणाली शिक्षण संस्थेचे बुवासाहेब हुंबरे उद्घाटक तर संयोजक सत्यशोधक समाज संघाचे अरविंद खैरनार अध्यक्ष म्हणून सहभागी होणार आहेत.
या सत्रात –
“कुळवाडीभूषण छत्रपती शिवरायांना शाक्त राज्यभिषेकाची आवश्यकता का वाटली?” या विषयावर शिवचरित्र अभ्यासक शिवश्री. गंगाधर बनबरे विचार मांडतील.
“सत्यशोधक समाज स्थापनेमागील महात्मा फुले यांची भूमिका व वर्तमान परिस्थितीत त्याची गरज” या विषयावर कॉ. किशोर ढमाले आपले विचार व्यक्त करतील.
तर विशेष सत्रात “संविधान, संस्कृती व बहुजन क्रांती” या विषयावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड संवादक म्हणून बोलणार असून, अध्यक्षस्थानी अभिनेते व विचारवंत किरण माने असतील.
यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी समाजपरिवर्तनासाठी चालू असलेल्या कार्याचा आढावा घेऊन, यापुढील योग्य कृती आराखड्याची आखणी व महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाचे महत्व अधोरेखित करतील.
कार्यक्रमाचे स्वागतगीत राखी रासकर व कवी बाबासाहेब जाधव यांची टीम सादर करणार आहे. प्रास्ताविक प्रा. प्रतिमा परदेशी, अप्पासाहेब गायकवाड, प्रा. उद्धव कोळपे व प्रा. अमृतराव काळोखे करणार आहेत. सूत्रसंचालन पत्रकार मुकुंद काकडे, अँड. नीरज धुमाळ, मोहिनी कारंडे व प्रा. संजयकुमार कांबळे करणार असून आभार प्रा. दत्ताजीराव जाधव, अंजुम इनामदार, शिवाजी लोखंडे व रघुनाथ ढोक मानणार आहेत. शेवटी ठरावाचे वाचनही होणार आहे.
या भव्य सोहळ्यास सत्यशोधक तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीकडून पत्रकार परिषदेत (दि. २५ सप्टेंबर, दुपारी १.३० वा.) करण्यात आले.