आटपाडी नगरपंचायत निवडणूक:भाजप-शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी–तीर्थक्षेत्र आघाडी तिरंगी लढतीचे संकेत!
२१९ अर्जांची विक्रमी नोंद : आटपाडी नगरपंचायतीत उमेदवारीचा तुफान ओघ :आज दाखल झाले ९१ अर्ज,१२ नगराध्यक्ष, ७९ नगरसेवक अर्ज दाखल!
आटपाडी kd24newz,;ता.१७ – आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचला असून शेवटच्या दिवशी तब्बल ९१ अर्ज दाखल झाले. यात १२ नगराध्यक्ष व ७९ नगरसेवक पदांचे अर्ज समाविष्ट असून आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण २२ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल १९७ अर्ज दाखल होऊन अर्जांची एकूण संख्या २१९ वर पोहोचली आहे. पहिल्याच निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
पहिल्यांदाच थेट जनतेतून एक नगराध्यक्ष व १७ नगरसेवक निवडले जाणार असल्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांनी सर्व प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल केले. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षासह केवळ एका नगरसेवकाचा अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात उमेदवार, पक्षकार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
दुपारी तीनपर्यंत अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू असताना मोठ्या प्रमाणात अर्ज शिल्लक राहिल्यामुळे स्वीकृतीची वेळ वाढवून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. काही उमेदवारांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशा तीन-तीन ठिकाणाहून अर्ज दाखल करून सर्व पर्याय खुले ठेवण्याचा प्रयत्न केला.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपाने यु. टी. जाधव, तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सौरभ पोपट पाटील, शिवसेनेने रावसाहेब सागर, राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरीनाथ नागणे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने सादिक खाटीक यांच्या अर्जासोबत पक्षांचे एबी फॉर्म जोडले. त्यामुळे एबी फॉर्म जोडलेल्या पक्षाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे समजते.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची दिवसभर सुरू असलेली बोलणी फिस्कटली असल्याची जोरदार चर्चा होत आहे.अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर स्वाभिमानी विकास आघाडी आणि राष्ट्रवादीची एकत्रित निवडणूक लढण्यासंदर्भात बोलणी सुरू झाली होती अशी सर्वत्र चर्चा होती.
अखेर त्यांच्यात समझोता झाल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी- स्वाभिमानी युती अशी तिरंगी लढत होऊ शकते.
